top of page

|| श्री.यशवंत माऊली || श्री परमहंस यशवंत बाबा पुण्यतिथी महोत्सव विशेष

Updated: Sep 10, 2021

|| श्री ||

|| गणेशाय नम ||

|| गुरुभ्यो नम: ||

|| श्री परमहंस यशवंत माऊली ||


ब्रम्हमूर्ती संत जगी अवतरले | उद्धाराया आले दीन जना || (नाम. म.)


प्रथम गणरायाला वंदन, तसेच श्री माता स्वरस्वती व समस्त संत सदगुरु परंपरेला वंदन करून. एका बटनावर भावी पिढीला गावाचा इतिहास व संतांचे विचार, ही संकल्पना राबविणारा RGDIAN ग्रुप यांना खूप शुभेच्छा देतो. तसेच मला संत जीवनावर प्रकाश टाकण्याची व मला नवीन शिकण्याची नामी संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी सर्व RGDIAN ग्रुपला धन्यवाद देतो.


ज्या भारतखंडात साक्षात भगवंत अवताराला आले. ती अत्यंत पावन व पुनीत भूमी आहे. परंतु भगवानालाही प्रिय असणारे संत ज्या मातीत जन्माला आले, ती भूमी महाराष्ट्राची आहे. तिथे ज्ञानोबारायांपासून ते तुकोबारायांपर्यंत संताची मांदियाळी वावरली.


ज्ञानदेवे रचिला पाया | उभारिले देवालया ||

तुका झालेसे कळस | भजन करा सावकाश ||


आचार आणि विचारांचा पाया रचून भक्ती ज्ञान वैराग्यरूपी इमारत तयार केली आणि गूढ असणारे गीतेचे तत्वज्ञान प्रगट करून संपूर्ण विश्वाला ब्राम्हभाव स्थितीत ओविले. भक्तीचा सुलभ सोपा मार्ग दर्शविला. त्याच संत परंपरेत अग्रस्थान पटकवले ते विदर्भप्रांताने. जी भुमी साक्षात आदी माय जगन्माता रुक्मिनीचे जन्मस्थान आहे. विदर्भामध्ये अनेक अवलिया, विदेही (देहमुक्त), जीवनमुक्त संत महात्मे अवतारी आले. जगविख्यात कर्मयोगी गाडगे बाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तसेच विदेही श्री. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, आडकोजी महाराज, सत्यदेव बाबा, मुंगसाजी महाराज, लहानुजी महाराज, गुणवंत बाबा आदि अनेक संत या भूमीवर अवतरले. प्रश्न असा आहे की, संत अवतरला का येतात?


वास्तविक मृत्यू लोकात येणाच्या तीन संकल्पना शास्त्रात आहे.

१) जन्माला येणे , २) प्रगट होणे , ३) अवतरला येणे, म्हणजेच

१) जीव :- जीव जन्मला येत असतो. || पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी ||

२) देव :- प्रगट होतात. || अयोनी संभाव,प्रगटला राघवा ||

३) संत :- अवताराला येत असतात. || अवतार तुम्हा धराया करून, उध्दाराया जन जड जीव ||

किंवा ||धर्म रक्षाया कारणे, साधू होती अवतीर्ने ||


जड जीवांचा उध्दार करण्यासाठी संत अवताराला येतात असेच एक महान संत आपल्या चांदस-वाठोडा गावी प्रगट झाले. त्यांच्या जीवन परिचय या लेखातून प्रगट करण्याचा प्रयत्न करीत आहे.


( ह. भ. प. मंगेश महाराज गावंडे, चांदस-वाठोडा )

 
|| परमहंस श्री यशवंत माऊली ||
 

जई अधर्मा शिग चढत | स्वधर्माच्या वाटा मोडत |

तईच खास भगवंत | अवतीर्ण होतो ||

उतारवया भूमीचा भार | कारवाया पतितांचा उध्दार |

सांभाळण्या भक्तजन संभार | अवतरतो भगवंत ||


पतितांचा उध्दार करण्यासाठी श्री. परमहंस संत यशवंत बाबा धोतरखेडा नगरीत अवतरला आले. परतवाडा शहराजवळ धोतरखेडा हे छोटस गाव, तिथे इंगळे घराणे प्रसिध्द होते. घरात पाटीलकी चालत असे.


जाधव कुणबी कुळ इंगळ्याचे| पाटील असुनी दिन वैभवाचे ||

सत्य अहिंसा ब्रीद जयाचे| मूर्तीमंत धर्मात्मे ||

मूळ पुरुष चंद्रभानजी व उदेभानजी दोघे बंधू. त्यातील उदेभानजी च्या पोटी चार मुले जन्मली.

१) बाजीराव २) लक्ष्मणराव ३) रामाजी ४) नारायणराव आणि चान्द्रभनजीचे पोटी रामाजी एकटेच जन्माला आले. त्यांचा विवाह अंबाबाई नामक मुऊलीशी झाला. दोघांचा संसार फुलला व त्यांच्या पोटी भगवानजीचा जन्म झाला. भगवानजी पोटी साक्षात प्रभू श्री. परमहंस यशवंत अवतरला आलेत.


अंबा रामजी पोटी | भगवानजीची मूर्ती गोमटी |

पुढे याच भगवानजी पोटी | जगजेठी यशवंता ||


भगवानजीचा विवाह जयवंती देवी यांच्या सोबत झाला. भगवानजी साक्षात वैराग्य मूर्ती व जयवंती माता साक्षात शांतीची देवता अत्यंत पवित्र, पावन आचरण,शुध्द करणी व पतिव्रता माऊली. योग्य समय पाहून पहिली मुलगी जन्मास आली. दुसरा मुलगा ......नामदेव यानंतर पाच मुल जन्माला येऊन मेली व नंतर


ऐशा कन्या पुत्रा| जयवंती प्रसवली सात रत्ना |

यापुढे आठव्याने यशवंता |प्रसवली खास ||


जसा आठवा अवतार श्री कृष्णाचा तसा आठवा अवतार श्री यशवंत बाबांच. कौसल्याने पुण्य केले म्हणून श्री राम प्रभू जन्मले तसेच माता जयवंतीचे पुण्य प्रगट झाले. श्री यशवंत बाबा उदरात असतांना, माता जयवंतीला अनेक दृष्ट्रांत होत असे. स्वप्नी भगवंत दर्शन देई, बाललीला कृष्णाच्या स्वप्नी दिसे. सात मास पूर्ण व मातेस मातेस डोहाळे सुरु झाले. वेड्यापिस्यासारखी माता राहायला लागली.


पतीताना उद्धराया कारण | मी येतो रे धावून |

तुम्ही का करता अनमान | अवतरतो मी शंकर ||


साक्षात महादेवाचा रुद्र अवतार मातेच्या पोटी प्रगट होणार आहे. प्रसूती कळा जवळ आला मंगल खुणा शरीरावर प्रगट होत आहे. उत्तम काळ, तिथी, वार, नक्षत्र पाहून रुद्र प्रगट झाले. दिनांक २३/१२/१९१९ रोजी श्री यशवंत बाबा अवतरीत झाले.



तोच पौष सुद्ध प्रतिपदेचा दिवस | शके अठराशे एकेचाळीस |

दिन मंगळवारी सुर्योदयास | जगतपती अवतीर्णी ||


श्रींचे आगमनाने सर्वांना दिव्य आनंद झाला. मेवा, मिठाई वाटली. बारश्याचा कार्यक्रम थाटात पार पडला, नाव ठेवले यशवंत. ब्राम्हणांनी पंचाग पाहून सांगितले,


जया करीता शास्त्र असती | तीच ही खास मूर्ती |

सांगू काय मी अल्पमती | बाल नव्हे भगवंत ||


सर्व जगताला यश देणारे यशवंत बाबांचं बालपण चालू झाल. १५ (पंधरा) महिने बाबा रडलेच नाही, नंतर रडण्याचा आवाज एकाला. ३ वर्षाचे झाले स्वत: टाळी वाजवत आणि भजन करत. खेळ सगळा देवघरात आणि खेळण्यास सवंगडी सगळे देवघरातील. देव ५ वर्षाचे झाले बाबा बोलू लागले. सहाव्या वर्षी शाळेत नाव घातले, शिक्षकांचे नाव श्री कृष्णराव होते. बाबा शाळेत रमलेच नाही. शाळेतून पळून जावे अनेक खोड्या कराव्या. गुरुजी म्हणायाचे मी शिकवतो तुम्हाला तर बाबांनी म्हणावे तू याला शिकव मी तुला शिकवितो. गावात चौथी पास झाले आणि बाबा परतवाड्यात सहावी पर्यंत शिकले. पुढे बाबा मोकळे झाले. वय १४ झाले. शेतकाम सुरु झाले. बाबा सुंदर दिसू लागले आणि माता जयवंतीच्या मनी विचार आला बाबांच्या लग्नाचा तो विचार पतीस सांगितला. गोष्ट लग्नाची निघाली व बहिरम जवळील खरपी गावाचे वखरे मारोतराव यांची कन्या कलावती यांच्या बरोबर विवाह ठरला साखरपुडा झाला. १६ मे १९३३ रोजी लग्न पार पडले. दुसऱ्या दिवशी अंगाची हळद फिटली. बाबा खेळायला निघाले हातात खडे (कांचे/गोट्या) घेवून खेळू लागले. गोट्या टूर मारला व तो आणायला सांगितला, कलावती देवीला. दोघेही लहान वय, प्रभूने गोट्या माराव्या व कलावतीने आणाव्या, अनेक धावा झाल्या कलावती थकून गेली. फार दमली बाबा म्हणत, "दमलीस का कलावती?"


संपवू का खेळाप्रती |

पूढे जान निश्चिती |

खेळणारची नाही ||


"आता पुढे मी खेळणार नाही. मी माझे राज दिल व तू तुझे राज दिले. तुझ माझ काहीच राहील नाही." फक्त पाच दिवस कलावती सासरी राहिली. वडील न्यायला आले, माहेरी गेली ती परत आलीच नाही. एका वर्षात कलावतीचे देहावसान झाले व बाबा संसारातून मुक्त झाले व बाबा इथून पुढे बाबांनी आपली लीला करण्यास प्रारंभ केला. वेड्यासारख वर्तन चालू केल, शेतात जात व माल उपडत, गुरांना चारततसेच गुरे शेतात आणून भर शेतात चारत असे. एके दिवशी चिंचेची डहाळी आणली व मातेला म्हणाले,“आई जो पर्यंत ही चिंचेची डहाळी हिरवी आहे तो पर्यंत मी जिवंत राहील." ती डहाळी वाळल नाही आणि पालाही गळला नाही. एकदा प्रभू सवंगड्यासोबत पोहायला गेले पाण्यात उडी मारली अर्धातास झाला तरी प्रभू वरती आलेच नाही. सवंगडी घाबरले वेड्याप्रमाणे स्वत:ला दाखवायला लागले. लोक म्हणायाचे आसरा लागल्या व उपाय सुरु झाले प्रभू मोठ्याने हसत, उड्या मारीत, कधी बडबड करीत तर कधी जोरात पळत सुटणे, देहभान विसरून हे सर्व करीत कोणी पाणी देत, देवापाशी नेत, कधी औषध देत, पण बाबा मात्र त्यांची लीला दाखवीत. एकदा एक नामांकित वैद्याने बाबाला विषाची मात्रा औषध म्हणून दिली. सांगितले की, एक गुंजभर खायला द्या, जास्त खालली तर विषबाधा होईल बाबांनी पूर्ण सात दिवसांची मात्रा खाल्ली. मातेने हे पाहिले चिंताक्रांत झाली बाबा म्हणाले आई विषबाधा पचवायची माझी जुनी सवय आहे.


‘मी हलाहल पूर्ण | पचविले जयवंती ||

जो दुरुस्त करी सर्वास | त्यास देती औषध ||

अनन्य उपायास |पारावार नाही ||


बाबांचा पारा संतापला रागावून बाबा म्हणाले, "अरे! मी अग्नीला गिळले, जहर पचविले तरी तुमचे धंदे बंद होत नाही." बाबांना वेड लागलेले सामजून खांबाला बंधुंन ठेवाले, दोन महिने झाले. एके दिवशी घरात कुणी नाही पाहून घरातले सर्व समान नदीत फेकले व धान्य, कापड सर्व वस्तू जमवून त्यांना अग्नी लावून दिली आणि सर्व घर मोकळे केले व म्हणले आता घर स्वच्छ झाले. आपल्या मुलाचे वेड ठीक करण्यासाठी सर्व उपाय भगवानजी व माता जयवंती करत. कोणी एकाने निरोप दिला की, गोविंदगिर बाबांची सामाधी सिध्द आहे ती पावते हे ऐकून बाबांना घेवून वासनी पांढरगाव येथे गेले, दर्शन झाले, नवस बोलला तेथील पुजाऱ्याने सव्वा महिना बाबांना येथेच राहू द्या असे सांगितले. पाच दिवस राहून खाण्यापिण्याचे सर्व सामान आणण्यासाठी भगवानजी बाबांना घेवून माघारी निघाले, मध्येच रस्त्यात अंजनगाव सुर्जी पर्यंत आले. बाजारात तंबाखू घेण्यासाठी दुकानात गेले सोबत बाबा ही होते. पायात बेड्या होत्या पण बाबांनी लीला दाखवली .बाबा तेथून गुप्त झाले, गुप्त झाल्यानंतर तीन वर्षे बाबांचा पत्ता नव्हता .



जो स्वयं परिपूर्ण | वन सेवाण्याचे काय कारण ||

कारण नसताही परिपूर्ण | तपची केले ||


तीन वर्षानंतर अमरावती पासून १० मैलावर असणारे माहुली गाव जिथे अनेक संतमहंत झाले त्या गावी बाबा प्रगट झाले आणि १२ वर्षापर्यंत बाबांनी माहुली गावी अनेक चमत्कार केले. अनेकांवर कृपा केली. अनेकांचे प्राण वाचविले. सर्व प्रसंग येथे देणे उचित नव्हे. आपण सर्व चारित्र्य श्री यशवंत लीलामृत ग्रंथात पहावे. उदा. साठी काही प्रसंग व नावे येथे देत आहे.


इनाम पिंजारी नावाचे इमाम त्यांच्या घरात बाब पहाटे पहाटे शिरले व मोट्यान ओरडत, "खबरदार पुढे आला तर, मी आहे, इथे निघुन जा". सर्व पहायला येतात तर भल्ला मोठा सर्प निघाला होता. बाबांनी त्याला धरलं व जंगलात सोडले.


मोतीराम सावकार ही व्यक्ती अत्यंत द्वारी दयाने पीडित खायची सुद्धा सोय लागतं नव्हती. पण सर्व लोक चेष्टेने त्यांना सावकार म्हणायचे. बाबा त्यांच्या घरी गेले व भाकरिपुरते आधी काम केले. त्यांच्या गाईसाठी चारा आणला व मग भाकर मागितली यांचीच सोय लागेना त्यात बाबा रोज भाकर मागायचे पण तो रोज भाकर देऊ लागला. एकदा त्याला बाबांनी तीन रुपये दिले व सागितले दुकान लाव तीस झाले. व तीसाचे अनेक रुपये शेतीवाडी, बगला झाला व खऱ्या अर्थाने सावकार बनले.


कुणी बिमार असेल त्याला चहा पाजावा व बिमारी संपवावी. अनेकांचे आजार बाबांनी घालविले. बाबा माहूलीला असतांनाच त्याला चमत्कार व येणाऱ्या गुणामुळे ख्याती गावोगावी पोचली होती. अशीच ख्याती जिचकार गुरुजी, सावंगी त्यांच्या पर्यंत पोहचली व बाबाचा फोटो त्यांना दिला व मन प्रभू दर्शनासाठी व्याकुळ झाले व स्वप्न पडले स्वपणात बाबांनी दर्शन दिले व नंतर स्वप्न जिचकार गुरुजी माहुलीला जाऊ लागले व बाबांनी वाटेवर भेट घेऊ लागले. नंतर बाबांनी आग्रह करून इ.स. 1950 साली ते प्रथम चांदसला वाठोडाला घेऊन आले. वरूड पर्यंत मोटारगाडी ने आले श्री. पंजाबराव देशमुख वाठोड्याचे गृहस्थ, वरुड ला तेल गाळण्यासाठी आलेले त्यांचा बेलगाडीत नेवून बाबा वाठोड्याला रात्री 7 च्या सुमारास आले सर्वांना बातमी कळावी अवलिया अवधूतमूर्ती गावात आली लोक दर्शनासाठी घाई करू लागले. चांदस वाठोडयाला पंढरपूरचे स्वप्न आले. कथा, भजन, कीर्तन सतत चालुही झाले दहा महिने गेले व संत महात्मा भक्तांच्या अंत:कर्णातील भाव समजतो बाबांना तो भाव, इच्छा कळायची व बाबा आता फिरायला निघाले. बाबा ज्या दिवशी गावात आले तो वार्षिक उत्सव लोकांनी करायचा ठरवला म्हणून दिवस ठरला.श्रावणमासातील नागपंचमीपासून पुढे तिसरा दिवस अनेक वर्ष हा उत्सव चांदसला शिव मंदिरात चालू राहिला.आता चांदस वाठोड्यात बाबांनी लीला व चमत्कार करण्यास प्रारंभ केला. श्री दौलतराव देशमुख आजारी पडले, बिमारी विकोपाला गेली. ही बातमी वाठोड्यातून चांदसला यायला वेळ नाही लागला. बाबा एकाएकी गाडीमध्ये बसले आणि भक्तांनी गाडी ओढली. थेट गाडी दौलतराव देशमुख यांच्या घरापुढे येवून थांबली आणि बाबा म्हणाले या घराचे मला पाणी पाजा. पाणी पिऊन बाबांनी राहिलेले पाणी परत दिले व बिमारास पाजण्याचे सांगितले. बिमार व्यक्ती क्षणात दुरुस्त झाला. जणू यमव्दारातून सोडवून आणले.


बाबांचे दोन दरबार झाले एक यशवंत वाडी व मुसाळखेडा व तिसरा पुसला आहे. एका पारधिन बाईचे बाळंतपण सुद्धा बाबांनी सुखरूप केले. असे अनेक दिवस गेले, म्हणाले "जाऊदे लवकर नाहीतर मरते" गाडी निघाली, मुसळखेडा गावी आली. तिथे भांजी पाटील राहत. वाड्यापुढे गाडी आली. बाबा आत शिरले चुलीजवळ बसले व चहापाणी मांगायला लागले भांजी पाटलाची सून नाव देवकाबाई खुप आजारी. दोन डॉक्टर तिथे असून निदान लागेना खाली टाकलं एक तास बाबांची समाधी लागली चुलीपुढ, व नंतर ओरडले "चले जाओ याहासे", बाबा काळाला, यमदुतांना माघारी पाठवत होते. दारात उभे राहून परत आले भाकर खाल्ली बाबांनी व चैतन्य आले. बाईला हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले लोकांना झोंबणार्‍या भुता पासून मुक्तता सुद्धा प्रभूंनी केली.



अश्या अनेक लीला चरित्र भगवंतांनी केली. आपण ती विस्ताराने वाचावी. ग्रंथात याच काळात अनेक अवतारी महानुभाव, संत, अवलिया, साधू पुरुष बाबांना भेटण्यासाठी येत व जात. त्यांच्या काळात एक दिव्य व तेजस्वी आपली साधना, तपश्चर्या व तीर्थयात्रा करून. चारही धामा करून श्री क्षेत्र जंगलात पुरी यात्रा करून श्री यशवंत माऊलीचा भेटीला आले. ते बाल भगवत श्री योगिराज बाबा, हरी हराची भेट झाली. अनेक दिवस यशवंत वाडी मध्ये सोबत राहिले सेवा केली. एका हाताने जसा भगवान कृष्णानी गोवर्धन धारण केला, जसा सेवा रुपी गोवर्धन बाल वयात श्री योगिराज बाबांनी पेलला. वय लहान होते अंदाजे 15 ते 16 असावे. एका हाताने चहा करून देणे नव्हे तर श्री यशवंत मालकांना भोजनाची व्यवस्था करणे. हे सगळ एका हाताने करत असे. अनेक दिवस जवळ जवळ चार वर्ष सहवास झाला. यशवंत वाडी, मुसळखेडा येथे श्री यशवंत बाबाकडे अनेक आजाराने ग्रासित लोक किंवा भक्त सतत यायचे. एक रुद्राचा अवतार तरं एक विष्णूचा अवतार श्री योगिराज बाबांना एकांत प्रिय असायचा, म्हणून साधूलक्षनाने युक्त असणारे श्री बाबा हुमंनपेठ स्थित श्री हनुमान मंदीरात राहू लागले. तिथेबाबाना भेटण्यासाठी श्री यशवंत बाबाची स्वारी येत. सोबत राहत व परत फिरायला निघत. (श्री. योगीराज श्री बाबाचा संपूर्ण चरित्र लिहिण्याचा मानस आहे, सदगुरु भगवान ते स्वतःच त्याचे कृपेने पूर्ण करेल.) तर १९५० पासून पुढे पाच वर्ष म्हणजे १९५५ पर्यंत श्री यशवंत प्रभूची लीला अखंड पने चालू होती , आणि मृत्युलोकाचा नियम आहे. इथे ज्याने जन्म घेतला, त्याला एक दिवस मृत्यूला सुद्धा सामोरे जावं लागत.

गीतेमध्ये भगवान बोलतात, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च |


जन्माला येणे आणि जाणे प्रत्येकाचं ठरलेलं आहे .

ज्ञानेश्वर म्हणतात ,

देहचिया गाव आलीया । मग जन्ममृत्यूच्या सोहलिया ।

ना म्हणोनये धनंजया । जया परी ।।

जसा जन्माचा सोहळा होतो तास मृत्यूचा सुद्धा सोहळा होतो, नव्हे तर मृत्यूचा सोहळा व्हावा अस जीवन जगावं लागत. आणि श्री यशवंत प्रभूचा हा सोहळा करायचं ठरलं. वास्तविक काळाचाही ते काळ आहेत. अनेक भक्तांना यमाच्या दारातून बाहेर काढलं पण निर्माण केलेलं चक्र मोडायचं नव्हतं, ते तर अमर आहेत, मरण तर देहाचं होत.



मरणाही आधी राहिलो मारोनी ।

हि त्यांची अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतलेली होती. जसे जुने वस्त्र टाकायचे आणि नवीन परिधान करायचे तास हा पंचमहाभूतांचा देह, जुना देह टाकायचा आणि नूतन धारण करायचा मनोमन विचार बाबानी केला असावा व आपल्या निष्ठावान भक्तांना तसे दृष्टांत व बोलण्यातून संकेत द्यायला सुरुवात केली पण स्पष्ट कुणालाच कळू दिले नाही. आणि तो भयंकर दिवस उदयाला आला. .

२० सप्टेंबर १९५५, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थीचा दिवस, वर मंगळवार, वेळ सकाळी १०वाजता, बाबानी आपली विश्रांतीची पूर्ण वेळ साधली. ओम प्रणवा उच्चारण करून अखंड समाधीत बाबा लिन झाले. महानिर्वान, महासमाधी बाबाची झाली. आणि सर्व भक्तांमध्ये शोककळा पसरली. जसा समुद्राने नदीचा त्याग करावा, आईने लेकराचं त्याग करावा तशी अवस्था झाली. भक्तांच्या हृदयावर वज्रप्रहार झाला. हृदय कासावीस झालं. सर्व समाज दुखत बुडून गेला बातमी कळताच सर्व भक्त जमाझाले, स्वतः श्री योगीराज बाबानी यशवंत बाबाना मांडी दिली. समाधीचे स्थान निश्चित केले. "यशवंता... यशवंता... ओम नमोजी भगवंता!" या नाम घोषात दुसऱ्या दिवशी बाबाना मंगल स्नान घातले, षोडशोपचार पूजा केली, दिव्य हार सुमने केशरी चंदन लावून श्री परमहंस बाबा ना समाधीत बसविले व शेवटचा निरोप दिला. सोहळा संपन्न झाला आजही श्री बाबांची कृपा आपल्या भक्तांवर अखंड तैलधारे प्रमाणे बरसात आहे. अनेक भक्त आजही बाबांच्या समाधी तीर्थाने पुनीत होऊन रोगमुक्त होतात व जीवन धन्य बनवतात.



अल्पावधी मध्ये श्री परमहंस सदगुरु यशवंत भगवान यांचा जीवन चरित्राचा सारांश भाग लिहिण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, मी धान्य झालो वास्तविक आकाशाला जशी गवसणी घालता येत नाही तशी संत जीवनाला व त्यांच्या चरित्राला गवसणी घालणे अशक्य आहे. व जो त्या ग्रंथामध्ये भाग नाही तो जेष्ठ मंडळींच्या मुखातून ऐकलेलं व त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टही इथे नमूद केल्या आहे. जे योग्य आहे ते सदगुरूकृपेचं आहे, जे चुकीचं वाटेल माझ्या बुद्धीचे दोष समजावं.


आभार: ।। श्री यशवंत लिलामृत ग्रंथ ।।

|| राम कृष्ण हरी || "यशवंता... यशवंता... ओम नमोजी भगवंता !"


 

लेखन :-

ह. भ. प. मंगेश महाराज गावंडे,

चांदस-वाठोडा (अमरावती)



 

| Shree Yshavant baba | Musalkheda | Dhotarkheda | Mahuli | Jayvanti Devi | Shree Bhagvantji | Chandas wathoda | Shree Yogiraj Maharaj | Paratwada | Amravati | Kalavati Devi | Shree Namdev | Shree Jichkar Guruji | Shala |

Comments


bottom of page